बारामती : राजकीय स्वार्थापायी पिढ्यानपिढ्या जनतेची पिळवणूक करीत असलेल्या पवार शाहिला उलथवून टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर येथे झालेल्या जाहीर सभेत बारामती मुक्तिसंग्राम पुकारण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंसह विरोधकांवरही चांगलाच नेम धरला.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजप, शिवसेना, रा.स.प., शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, आर.पी.आय.(ए) महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. कांचन राहुल कुल यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. त्यामध्ये हा निर्धार व्यक्त करण्यात आला. ऐतिहासिक पालखी तळावर झालेल्या या सभेला राज्य मंत्री विजय बापू शिवतरे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, खासदार संजय काकडे, संगितराजे निंबाळकर, बारामती मतदारसंघाची जबाबदारी असलेले गणेश बिडकर, राजेश पांडे, महायुतीचे स्थानिक नेते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
‘पंतप्रधान मोदींनी देशात गरिबांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. देश चालवण्यासाठी ५६ पक्षांची आघाडी लागत नाही, तर ५६ इंचाची छाती लागते हे मोदींनी अनेक निर्णयाद्वारे जनतेला दाखवून दिले आहे. मोदी म्हणाले होते ते खरे आहे, पवार साहेबांना हवेचा अंदाज चांगला समजतो. त्यामुळे त्यांनी माढ्यातून माघार घेतली. देशात मोदींची हवा आहे हे लक्षात आल्याने ते आता मुलीसाठी व नातवासाठीच फिरत आहेत. ४८ जागांची काळजी त्यांनी सोडली आहे,’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी माढा आणि बारामती, मावळ आम्हीच जिंकणार असल्याचा दावा केला.
‘या निवडणूकीत बारामतीकरांनी बारामतीत ३२ किलोमीटर परिसरात २ दिवसात ७ सभा घेतल्या. त्या कमी पडल्या की काय म्हणून आता साहेबांनी रेल्वेचे इंजिन भाड्याने घेतले.’ असे म्हणत त्यांनी ‘पूर्वी लोक सायकल भाड्याने घेत होते, गाडी भाड्याने घेत होते, या निवडणुकीत मात्र शरद पवारांनी इंजिन भाड्याने घेतले आहे. ते ही असे इंजिन भाड्याने घेतले जे म्युझियममधील कोळशाचे इंजिन आहे. अशाने त्यांची बारामतीची गाडी पुढे सरकणार नाही’ अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
पवार यांना पुन्हा बारावा खेळाडू म्हणून संबोधित करून मुख्यमंत्री म्हणाले की, आयुष्यात खूप कमी वेळा इतिहास घडविण्याची वेळ येते. तशीच वेळ आत्ता आली आहे. पवार यांची सत्ता उलथवून टाकण्याच्या बारामती मुक्ती संग्रामात कमळाचे एक बटण दाबून सहभागी होण्याची संधी तुम्हाला आहे. ही संधी आता दवडली तर तुमच्या पुढील पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. ही केवळ स्थानिक प्रश्नांची निवडणूक नाही, तर राष्ट्रीय अस्मिता, घराणेशाही विरूद्ध विकास अशी निवडणूक आहे, असे फडणवीस म्हणाले.
‘पुरंदरमधील नियोजित छत्रपती संभाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प ‘समृद्धी’प्रमाणे शेतकरी-जमीन मालकांशी चर्चा करूनच पूर्ण करणार आहे. त्याचे आकर्षक पॅकेज आणि जमीन संपादनासाठी लागणारी तरतूदही केली आहे. हे विमानतळ म्हणजे पुरंदरच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली ठरणार आहे,’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुरंदर विमानतळाबाबत भाष्य केले.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीचा विकास करण्यासाठी सरकारने २५० कोटींचा तीर्थक्षेत्र आराखडा तयार केला आहे. आचारसंहिता असल्याने बोलणे योग्य नाही. पण खंडेरायाचा आशीर्वाद आम्ही मिळवणार आहोत, तसेच ६५०० हेक्टर जमिनीवर जेजुरी ‘एमआयडीसी’चे विस्तारीकरण होऊ घातले आहे. त्यामुळे शेकडो आंतरराष्ट्रीय उद्योग येथे येत आहेत. त्याचा फायदा स्थानिक भूमिपुत्रांना होणार आहे. सासवड शहराची ५८ कोटी रुपये खर्चाची भुयारी भूमिगत गटार योजना दोन्ही काँग्रेसची सत्ता असताना १५ वर्षांत मंजूर केली नाही. ती मी, पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांच्या रेट्यामुळे मंजूर केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत गुंजवणी प्रकल्पाला खूप महत्व आहे. पुरंदरचे राजकारण या प्रकल्पाभोवतीच फिरत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी तोच धागा पकडून भाषण केले. यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. गुंजवणी प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी चुकीचा शब्द वापरला. पण आपली सॉरी म्हणत त्यांनी लगेचच आपली चूक सुधारली.
यावेळी उमेदवार सौ. कांचन राहुल यांनीही आपण पवार कुटुंबियांविरोधात बंड पुकारल्याचे सांगितले. कुल कुटुंब नेहमी बंड करण्यासाठी परिचित आहे. माझ्या उमेदवारीचे हे बंडच आहे. त्यात मी यशस्वी होणारच असा निर्धार कुल यांनी व्यक्त केला. कुल म्हणाल्या, पुरंदरची ओळख दुष्काळी तालुका म्हणून होती. इथे लग्नासाठी कोणी मुली देत नव्हते. मात्र ती ओळख आता युती सरकारने पुसली आहे. जलयुक्त शिवारसारखी कामे, सिमेंट बंधारे, पाझर तलाव, गुंजवणी प्रकल्प, आदी जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांच्या माध्यमातून विकास केल्याचे कुल यांनी सांगितले.
वेडात मराठे वीर दौडले सात, हे गाणे आणि प्रतापराव गुजर यांचा इतिहासातील उल्लेख करून जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी पवाररूपी बिलोल खान याला माफ करू नका, असे आवाहन केले. खास पुरंदरच्या शैलीत त्यांनी पवार शाहीच्या कारभाराची पोलखोल केली. दौंड, खडकवासला, पुरंदर लाखोंचे लीड देतील. पण भोर आणि इंदापूरने आता स्वाभिमान जगवावा. इतिहासातील चुका पुन्हा करू नयेत. बिलोल खानचा खात्मा कराच, असे ते म्हणाले आणि त्यांना जोषपूर्ण प्रतिसाद मिळाला.
भाजपचे लक्ष बारामतीवर, परिवर्तन घडविण्याचा निर्धार
भाजपने यंदा बारामती मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचा निर्धार करून प्रचाराची आखणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने संपूर्ण लक्ष बारामतीवरच केंद्रित केले असून, केंद्रीय स्तरापासून राज्य स्तरावरील सर्व प्रमुख नेते प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या बारामती लोकसभेंतर्गत येणा-या विविध विधानसभा मतदारसंघात सभा होणार आहेत.
कांचन कूल यांच्या प्रचाराच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी भाजपने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहे. बारामती मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात संपर्क मोहीम राबविल्यानंतर येत्या आठवड्यात प्रचार सभांवर संपूर्ण भर देण्यात आला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची सभा बारामतीमध्येच घेण्यात येणार आहे. शहा यांची सभा शुक्रवारी (१९ एप्रिल) होणार आहे.
बारामती मतदारसंघातील प्रचार २१ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संपणार असल्याने शनिवार-रविवारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि इतर काही नेत्यांच्या सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बारामतीच्या प्रचाराची सांगता मुख्यमंत्र्यांच्या सभेने केली जाण्याची शक्यता आहे.
(PRAHAAR)