प्रहार वेब टीम
पणजी: गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा या भाजपच्या महिला आघाडी अध्यक्षा असल्यासारख्याच वागत आहेत. राज्यातील प्रशासन कोलमडण्यास त्याच जवाबदार आहेत. गोवेकरांच्या कराच्या पैशांवर साधनसुविधा भोगणा-या राज्यपाल गोव्यासाठी बोजा ठरल्या आहे, त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
चोडणकर म्हणाले की, राज्यपाल सिन्हा यांनी राजीनामा देऊन या पदावरुन दूर व्हावे अन्यथा राष्ट्रपतींना पत्र पाठवून त्यांच्या बडतर्फीची मागणी करु. असा इशारा दिला. 2017च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असतानाही राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला न बोलावता भाजप आघाडीला सरकार स्थापण्याची संधी देऊन पहिली मोठी चूक केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने गेले ११ महिने प्रशासन ठप्प आहे. आम्ही पाच ते सहावेळा राज्यपालांची भेट घेऊन कोलमडलेल्या प्रशासनाविषयी कल्पना दिली. प्रत्येकवेळी त्यांनी केवळ आश्वासने दिली आणि त्यापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे आता आणखी त्यांच्या भेटी घेण्याचे बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. घटनात्मक जबाबदारी निभावण्यात त्या पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. थोडी जरी नैतिकता त्यांच्याकडे असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देऊन घरी जावे, अन्यथा पुढील तीन-चार दिवसात राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांना या पदावरुन हटविण्याची मागणी करु.
चोडणकर म्हणाले की, खाणबंदीचा प्रश्न हे सरकार सोडवू शकलेले नाही. लोक रस्त्यावर उपाशी आहेत. त्यामुळे येत्या 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती संग्राम दिनी राज्यपालांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार घालू. पक्षाच्या सर्व आमदारांनाही मी तशी विनंती करणार आहे. काँग्रेस आमदार आक्रमक झाल्यामुळे गोव्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.