मुंबई : २६/११ ची ती रात्र आणि सीएसटी स्थानकात दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी केलेला अंधाधुंद गोळीबार, स्थानकातील प्रवाशांच्या किंकाळ्या, काही रक्तबंबाळ झालेले तर काही जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत असलेले प्रवासी.. त्या कटू आठवणींनी आजही अंगावर शहारे येतात.
रेल्वेचे अनाउंसर बबलुकुमार दीपक यांनी २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले होते. या कार्याबद्दल मध्य रेल्वेने त्यांना शौर्य पुरस्कारे सन्मानितसुद्धा केले आहे. सध्या बबलुकुमार भायखळाच्या रेल्वे रुग्णालयात ज्युनिअर क्लार्क पदावर कार्यरत आहेत. २६/११च्या दशकपूर्तीनिमित्त त्या कटू आठवणींचे साक्षीदार असलेले बबलुकुमार यांनी त्या घटनेला उजाळा दिला.
२६/११च्या रात्री मेन मार्गावर ते डय़ुटीवर कार्यरत होते. स्टेशन मास्टरच्या केबिनच्या वरच त्यांची केबिन होती. त्यावेळी ९ वाजून ५० मिनिटांनी हुसैनसागर एक्सप्रेस सीएसएमटीवरून रवाना झाली आणि काही वेळातच पुण्याहून इंद्रायणी एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकात दाखल झाली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. प्रवासी जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते. काही रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडत होते. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी क्रमांक १३,१४,१५ च्या प्रवाशांना मागच्या बाजूने जाण्याची सूचना उद्घोषणेने केली. त्यांनी वरिष्ठांना सूचना दिली आणि केबिनचे दिवे बंद करुन दरवाजाला आतून कडी लावली. त्याक्षणी तो शेवटचा दिवस होता असे त्यांना वाटत होते. मरण डोळ्यांसमोर असताना जमेल तितका वेळ कर्तव्य बजावयचे हे मनाशी पक्के ठरवूनच प्रवाशांना उद्घोषणेद्वारे सूचना देत राहिले. त्या दिवशी ते तब्बल २७ तास उद्घोषणा कक्षात दार बंद करून जीवणमरणाशी संघर्ष करत होते.
(PRAHAAR)